भारताचे राष्ट्रगीत ‘जन गण मन’ वर काही लोक जाणीवपूर्वक चिखलफेक करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रा. रंगनाथ तिवारी यांनी केलेला हा खुलासा. अंबाजोगाई मराठी साहित्य परिषदेच्या मासिक ‘साहित्य मैफलीत’ प्रा. तिवारी यांचे ‘टागोरांची कविता’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यावेळी आपले विचार मांडताना त्यांनी भारताच्या राष्ट्रगीताच्या इतिहासाबद्दल काही माहिती पुरवली.
– प्रा. रंगनाथ तिवारी
‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी लिहीलेले नव्हते. टागोरांविरुद्ध अपप्रचार करणा-यांनी इतिहास नीट समजून घ्यावा. पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी गीत लिहा, अशी विनंती त्यांच्या मित्राने केली असता रविंद्रनाथ त्यावर भडकले होते. ‘हा कसला नायक? खरे नायक या देशातील कष्टकरी आहेत, असे त्यांनी सुनावले होते. त्याच रागात त्यांनी हे गीत लिहीले. आपण त्या गीतातील एकच कडवे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले आहे. संपूर्ण ‘जन गण मन’ वाचल्यानंतर त्याचा गर्भार्थ लक्षात येतो. रविंद्रनाथांसारखा स्वातंत्र्यप्रेमी, देशभक्त, दिग्गज कवी कोण्या सत्ताधा-यासाठी स्तुतीकवन लिहूच शकणार नाही.
रविंद्रनाथ टागोरांचे तीन हजार पदांचे ‘गीतवितान’चे तीन खंड आहेत. त्याशिवाय त्यांचे 54 कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. अनेक गीते त्यांनी रचली. गीतांजलीत फक्त 102 कवितांचा समावेश आहे. त्यास किट्स या जगप्रसिद्ध कवीची प्रस्तावना लाभली आहे. 13 मार्च 1913 रोजी ‘गीतांजली’ला नोबेल पुरस्कार मिळाला होता. गीतांजलीतील कविता तत्वज्ञान सांगणा-या असल्या तरी टागोर हे मुळात प्रेमकवी होते. टागोर कथाकार, कादंबरीकार, नाटककार तर होतेच. ते उत्तम चित्रकार, शिल्पकारही होते. ते संगीततज्ञ होते. रवींद्र संगीताचे जनक होते. ते विचारवंत होते तसेच धुरंधर राजकारणीही होते. पंजाबची फाळणी होऊ नये यासाठी ते रस्त्यावर उतरले होते. ते शिक्षणतज्ञही होते. त्यांनी शांतीनिकेतन, श्रीनिकेतन यासारख्या संस्था उभ्या केल्या. टागोरांनी लिहीलेली दोन गीते दोन देशांत (भारत आणि बांगलादेश) राष्ट्रगीत म्हणून गायली जातात. त्यांचे ‘एकला चलो रे’ हे गीत महात्मा गांधींनी त्यांच्या प्रार्थनेत समाविष्ट केले होते. त्यांचे वैयक्तिक आयुष्य अनेक अनुभवांनी समृद्ध होते.
7 ऑगस्टला रविंद्रनाथ टागोरांचा स्मृतीदिन झाला. देशाचे राष्ट्रगीत लिहीणा-या व साहित्याचे नोबेल संपादन करून देशाचा गौरव वाढवणा-या या कलावंताला मात्र देश विसरत चालला आहे.
प्रा. रंगनाथ तिवारी, दूरध्वनी – 02446-247976,
रविंद्रनाथांच्या कविता मराठीतून वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना ‘फीचर रायटिंग’ या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला.
गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्यासारख्या व्यक्तींच्या साथीने ‘ग्रंथाली’ची स्थापना केली. ती पुढे महाराष्ट्रातील वाचक चळवळ म्हणून फोफावली. त्यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ‘ग्रंथाली’च्या ‘रुची’ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत ‘ग्रंथाली’ची चारशे पुस्तके त्यांनी संपादित केली. त्यांनी संपादित केलेल्या मासिके-साप्ताहिके यांमध्ये ‘एस.टी. समाचार’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. गांगल ‘ग्रंथाली’प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा’चे संस्थापक सदस्य आहेत.
साहित्य, संस्कृती, समाज आणि माध्यमे हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांनी त्यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि ‘स्क्रीन इज द वर्ल्ड’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘सर्वोत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती’चा पुरस्कार, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ व ‘मराठा साहित्य परिषद’ यांचे संपादनाचे पुरस्कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्हाण’ पुरस्कार लाभले आहेत.