शिक्षणपद्धत ही जीवनदृष्टी – नयी तालीम
‘नयी तालीम’ हे सर्वोदयी व अहिंसक समाजनिर्मितीसाठी साधन आहे अशी महात्मा गांधी यांची भूमिका होती. गांधी यांनी ती पद्धत प्रथम दक्षिण आफ्रिकेत असताना तेथील आश्रमातील मुलांच्या शिक्षणासाठी वापरली. त्यातून त्यांचे चिंतन विकसित झाले. काँग्रेस प्रांतिक सरकारे भारतात 1937 साली स्थापन झाली. तेव्हा गांधी यांनी बुनियादी शिक्षणाची सविस्तर मांडणी वर्धा येथील शिक्षण संमेलनात केली. विदेशात उच्च पदवी घेतलेले व रविंद्रनाथ टागोर यांच्यासोबत काम केलेले आर्यनायकम पतिपत्नी यांनी शाळेची जबाबदारी घेतली. त्यानुसार वर्धा येथे आणि भारतात बिहार, ओरिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, काश्मीर या राज्यांत शाळा सुरू झाल्या. ‘नयी तालीम’ पद्धतीच्या शाळा 1956 साली एकोणतीस राज्यांत अठ्ठेचाळीस हजार होत्या आणि त्यात पन्नास लाख मुले शिकत होती. गांधी यांच्या शिक्षणविचाराचा प्रसार इतक्या मोठ्या प्रमाणावर झाला होता. शासनाने मात्र, गांधी यांची ती शिक्षणपद्धत स्वीकारली नाही. शासनाने तो शिक्षणविचार सोडून दिला. त्यामुळे शाळा बंद पडत गेल्या. भारतात केवळ त्या प्रकारच्या पाचशे शाळा सुरू आहेत.