मराठी पंडिती (आख्यानपर कविता) (Marathi Pandit Poet)
मराठी काव्य मध्ययुगात पंडिती अंगाने प्रकट झाले. ते अभ्यासून कविता लिहीत. त्यात काव्याचा उत्स्फूर्त आविष्कार नसे. पंडित कवींनी रामायण, महाभारत, भागवत पुराणे, रघुवंश, कुमारसंभव, हनुमन्नाटक(प्रभु रामचंद्र यांच्या जीवनावर आधारित ग्रंथ), शकुंतला यांसारख्या संस्कृत काव्यातील विषयांना त्यांच्या काव्यलेखनाचे विषय म्हणून निवडले. मुक्तेश्वर, वामनपंडित, रघुनाथ पंडित, सामराज, श्रीधर, नागेश, विठ्ठल, मोरोपंत या कवींना पंडितकवी म्हणूनच ओळखले जाते. त्यांच्या रचना मुख्यत: संस्कृत काव्याच्या वळणावर, विविध गणवृत्तांवर आधारित लिहिलेल्या आख्यानपर होत्या.
मध्ययुगीन मराठी वाङ्मयात पंडिती काव्याचे दालन समृद्ध आहे. पंडिती काव्याचा कालखंड यादवकाळ, शिवकाळ आणि पेशवेकाळ असा आहे. त्या काळातील पंडित विद्वानांनी विद्वान वाचकांना समोर ठेवून जी काव्यनिर्मिती केली त्या रचनेला पंडिती काव्य ही संकल्पना वापरली जाते.