अण्णांचे स्पिरिट
अण्णा हजारे यांचे दिल्लीतील उपोषण गाजले नाही. त्याची फलनिष्पत्तीदेखील अण्णांचे कार्यकर्ते व सरकार यांच्याकडून खूप उत्साहाने व्यक्त झाली नाही, त्याचे एक कारण म्हणजे अण्णांनी सरकारने आश्वासने न पाळल्यास उपोषणास पुन्हा बसण्याचा इशारा दिला आहे. सरकारला एवढ्या अल्पावधीत कोणत्याही आश्वासनांची पूर्तता करता येणार नाही. त्या परिस्थितीत अण्णांची तब्येत कशी आहे? त्यांचा निर्धार किती पक्का आहे? यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतील.
मुद्दा अण्णांचे उपोषण फसले की फसले नाही हा नसून, त्या निमित्ताने सामाजिक विकृती स्पष्ट झाली हा आहे व त्याकडे हेरंब कुलकर्णी यांनी योग्य प्रकारे लक्ष वेधले आहे. हेरंब हे शिक्षक होते. त्यांनी नोकरी सोडून शिक्षणविषयक प्रश्नांकडे लक्ष वेधणे सुरू केले. त्यासाठी ते खूप भटकले, त्यांनी वेगवेगळ्या पाहण्या केल्या, लेखन केले - ते मिळेल त्या माध्यमातून लोकांसमोर मांडले. त्यांचे ते 'वन मॅन मिशन' होऊन गेले. त्यात त्यांना साने गुरुजी 'गवसले'. त्यांनी ती मांडणी लोकांसमोर केली. हेरंब यांच्या लेखनात विचारांपेक्षा भावना ओसंडून वाहते. स्वाभाविकच हेरंब हे साने गुरुजीप्रेमी वर्तुळात प्रिय झाले. पण गुरुजींनी विचारसाहित्य लिहिले आहे आणि त्यांनी त्यांचे विचार कृतीतदेखील उतरवले आहेत, याकडे मात्र गुरुजीप्रेमींचे दुर्लक्ष होते.