नाव नाशिक; नव्हे, ‘नासिक’
‘नासिक शहर’ हे प्राचीन असे नाव आहे. सध्या सगळे लोक ‘नासिक’ या शहराच्या नावाचा उल्लेख हा ‘नाशिक’ असा करतात. परंतु त्या शहराचे मूळ नाव ‘नासिक’ असे आहे. ‘नासिक’ शहर हे भारतातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. दक्षिणेकडील गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘गोदावरी नदी’चा उगम हा त्र्यंबक गावाला लागून असलेल्या ‘ब्रह्मगिरी’ पर्वतावर होतो. ‘नासिक’ शहरात शिरताना गोदावरी नदीचे पात्र फार विस्तारलेले दिसते.
प्राचीन काळामध्ये ‘नासिक’ शहराचे उल्लेख हे नासिक्य, जनस्थान, त्रिकंटक; तसेच, पद्मनगर असेदेखील आढळून येतात. रामायणामध्ये आलेल्या उल्लेखानुसार दंडकारण्यातील ‘जनस्थान’ म्हणजेच ‘नासिक’. ‘नासिक’मधील ‘पंचवटी’ म्हणजे पाच ऋषिकुमारांचे प्रतीक असून ते शापित ऋषिकुमार प्रभू रामांच्या स्पर्शाने मुक्त झाले असे मानले जाते. राम, लक्ष्मण, सीता गोदावरीच्या तीरावर जनस्थानामध्ये पंचवटी येथे पर्णकुटी बांधून राहिले होते, ते ठिकाण म्हणजेच ‘नासिक’.