कयाधू नदी - पुनरुज्जीवनाची लोकचळवळ
हिंगोली जिल्हा-तालुक्यातील कयाधू नदीला पुनरुज्जीवित करण्यासाठी ‘उगम ग्रामीण विकास संस्था’ व तिचे संस्थापक जयाजी पाईकराव यांनी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. हिंगोली जिल्ह्यात पैनगंगा, पूर्णा व कयाधू या तीन नद्या आहेत. पैनगंगा नदी व पूर्णा नदी हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहतात. त्या नदीतील निम्मे पाणी हिंगोली जिल्ह्यात तर निम्मे पाणी शेजारील जिल्ह्यांत वापरले जाते. कयाधू नदी जिल्ह्याच्या मध्यातून वाहते, म्हणून त्या नदीला जिल्ह्याची ‘जीवनवाहिनी’ मानले जाते. नदीचा उगम वाशीम जिल्ह्यातील अगरवाडी ह्या गावी होतो, तर तिचा संगम, म्हणजे कयाधू म्हणून तिच्या अस्तित्वाचा शेवट नांदेड जिल्ह्यातील चिंचोली या गावी होतो. ती तेथे पैनगंगा नदीला मिळते. कयाधू नदीची लांबी नव्व्याण्णव किलोमीटर आहे. नदी तीव्र उताराची असल्याने व पाणलोट क्षेत्रविकासाची रचनात्मक कामे झालेली नसल्याने नदी केवळ जून ते ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत वाहते. कयाधू नदी पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत बारमाही वाहत होती. गावातील मुले उन्हाळ्यामध्ये पोहण्यास नदीवर जात, तर पालक आजोबा नदीमध्ये बरू व अंबाडी पिकांचे अवशेष भिजण्यासाठी ठेवत असत. त्यांपासून पुढे ताग काढला जाई. ताग दोरी बनवण्यासाठी अंबाडी व बरू, झोपडी बनवण्यासाठी वापरत असत. परंतु वाळू उपसा, पाणी उपसा, पाण्याचे सुनियोजन झाले नाही, लोकस्तरावरून पुनर्भरणासाठी प्रयत्न केव्हाच केले गेले नाहीत, वृक्षतोड सतत चालू होती. हे सारे प्रमाण जसे वाढत गेले तसतसा नदीचा प्रवाह आटत गेला.