महाराष्ट्राचे संस्थाजीवन औपचारिक झाले आहे का? जुन्या संस्थांचे नित्याचे कार्यक्रम नियमित होत असतात. प्रकाशन समारंभांसारखे प्रासंगिक कार्यक्रम मोजक्याच श्रोत्यांच्या उपस्थितीत कौटुंबिक हौस-मौज वाटावी अशा तऱ्हेने घडून जातात. कौतुकाच्या समारंभांत उपचार अधिक असतो आणि वाद-टीका, उलटसुलट वार-प्रतिवार असे काहीच सार्वजनिक जीवनात घडताना दिसत नाही. माणसा माणसांतील स्नेह, जिव्हाळा ओलाव्याने व्यक्त होतानाही जाणवत नाही. ज्या बातम्या समोर येतात त्या अत्याचारादी विकृतीच्या आणि राजकारणातील गुन्हेगारीच्या. त्यांतील कट-कारस्थाने पाहिली की दीपक करंजीकरांच्या कादंबऱ्यांची आठवण येते. समाजातील चैतन्य हरपले कोठे आहे?
सहज, वर्तमान जाणावे म्हणून गेल्या 26/27 फेब्रुवारीच्या आसपास मुंबई परिसरात घडलेल्या कार्यक्रमांचा वेध घेतला, तर मला पुढील नोंदी करता आल्या :
एक – ‘पेरीप्लस ऑफ हिंदुस्थान’ या द्विखंडात्मक पुस्तकाचे एशियाटिक सोसायटीत प्रकाशन झाले. महत्त्वाचा रोचक असा ऐतिहासिक दस्तावेज आहे तो. दोनशे माणसे उपस्थित होती. ती सारी मनात खुशी घेऊन गेली.
दोन – विद्याधर पुंडलिक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कथांचे वाचन व एकांकिकेचा प्रयोग असा चार तास कार्यक्रम ‘दीनानाथ’मध्ये झाला. तेथेही दोनतीनशे प्रेक्षक भारावून बाहेर पडले. तसेच कार्यक्रम त्या पाठोपाठच्या दोन दिवसांत जयवंत दळवी व गंगाधर गाडगीळ यांच्या जन्मशताब्दीनिमित्त योजले गेले होते.
तीन – चित्रकार गायतोंडे यांच्यासंबंधीच्या मराठी पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर शांता गोखले यांनी केले आहे. तो समारंभ ‘शिवाजी वस्तुसंग्रहालया’त वेगवेगळ्या क्षेत्रांतील आठ-दहा नामवंतांच्या उपस्थितीत झाला. त्याला उत्तम संख्येने जाणकार कलारसिक हजर होते.
चार – पद्मश्री वैज्ञानिक शरद काळे शाळाशाळांत वैज्ञानिक दृष्टिकोन फैलावण्यासाठी स्पर्धा व खेळ घेत असतात. त्यांची अंतिम स्पर्धा नव्या मुंबईत उत्साहात घडून आली.
पाच – सतीश आळेकर यांच्या ‘ठकीशी संवाद’ या नव्या नाटकाचा प्रयोग यशवंत नाट्य मंदिरात झाला. तेथे चार-पाचशे प्रेक्षक असतील. सतीश आळेकरचा जब्बार पटेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एकूण वातावरण ‘थिएटर ॲकॅडमी’च्या जुन्या काळातल्या प्रयोगांसारखे वाटले.
सहा- मराठी भाषा दिनाचा सरकारी कार्यक्रम ‘गेटवे’वर दिमाखदार पद्धतीने झाला. मान्यवरांना मोठे पुरस्कार दिले गेले.
सात – मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यापासून सर्वत्र उत्सवाचे वातावरण आहे. त्यामुळे गल्लोगल्ली तशा प्रकारचे मराठीच्या उत्थापनाचे कार्यक्रम घडून आले व येत आहेत. एंटरटेनमेंट इंडस्ट्रीलादेखील अभिजाततेबद्दलच्या औत्सुक्याची चुणूक जाणवून गेली आहे. त्यात देखावा असतो, पण मुळाशी आस्था असतेच !
मी त्यांतील चार कार्यक्रमांना उपस्थित होतो. बाकीच्या तीन कार्यक्रमांचा प्रथमदर्शी वृत्तांत मिळवू शकलो. माझ्या असे लक्षात आले, की अशा कार्यक्रमांचा वृत्तांत माध्यमांतून प्रसृत झाला तर त्यामध्ये महाराष्ट्रभरातील दोनपाच लाख लोकांना तरी स्वारस्य वाटेल. ते त्या घटनांचा कदाचित पाठपुरावा करतील आणि तो भला भाव त्यांच्या स्नेही-नातलग मंडळींत पसरवतील. त्यामुळे विकृत बातम्यांनी येणाऱ्या खिन्नतेला; उदासीनतेला आळा बसेल. यालाच सोशल मीडिया म्हणतात ना? मला डिजिटल सोशल मीडिया गावगप्पांसारखा वाटतो. पूर्वी खेड्यात पारावर गावकरी जमत. मुख्यतः टवाळगप्पा चालत. त्यात गॉसिप असे. पण एखाददोन विधायक सूचनाही येत. त्याआधारे गाव पुढे जाई. गावातील वातावरण विधायक घटनांनी भरलेले सात्त्विक राही. सध्या बहुसंख्य समाजव्यवहार निकोप पद्धतीनेच होत आहेत, बीड, पुण्याचे स्वारगेट यांना जेवणातील चटणी-लोणच्यापुरतेच लोकांच्या अभिरूचीत स्थान आहे.
डिजिटल सोशल मीडियाला जोडून आणखी एक शब्द येतो. तो म्हणजे ‘व्हायरल’. त्या शब्दाची गंमत तो शब्द उच्चारणाऱ्या व्यक्तीपुरतीच असते. कारण बारा-तेरा वर्षांपूर्वीच्या ‘कोलावरी’सा
‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’मध्ये आम्ही महाराष्ट्राचा चांगुलपणा व विधायक वृत्ती ‘नेटवर्क’ करू पाहत आहोत. फाउंडेशनची स्थापना ‘ग्रंथाली’चा पुढील टप्पा म्हणून पंधरा वर्षांपूर्वी झाली, तेव्हापासून हाच विचार आहे. ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेब पोर्टलवर त्याच बेताने महाराष्ट्रीय जीवनाचे माहिती संकलन केले जाते. तशा लेखांची संख्या आठ हजारांपर्यंत जाऊन पोचली आहे. माहितीचा एकूण साठा पाहता ती संख्या अल्प आहे. परंतु त्यातून महाराष्ट्राच्या तालुक्या तालुक्यात चालू असलेल्या नवजागरणाची झलक कळते. त्यामधून महाराष्ट्राचे संस्कृतिसंचितही दृगोचर होत असते. पोर्टल नियमितपणे एक लाख लोक पाहत असतात आणि पन्नास उत्सुक लोक तरी त्या संबंधातील वेगवेगळ्या विचारणा कळवत असतात.
असा प्रत्यय येत असल्यामुळे मनात प्रश्न निर्माण झाला, की या नव्या तंत्रज्ञानभारित जगतात हरवलेले सांस्कृतिक जग पुन्हा आणता येईल का? ते सत्तरऐंशीच्या दशकातील सांस्कृतिक जग होते नवचित्रपटांचे, छबिलदास-थिएटर ॲ
सतीश आळेकरच एकदा म्हणाला होता, की पूर्वी वृत्तपत्राची एक एडिशन असे. त्यामुळे आमचे प्रयोग बातम्यांतून व जाहिरातींतून साऱ्या महाराष्ट्रभर ठाऊक होत. आता वृत्तपत्रांच्या आवृत्ती शहरागणिक प्रसिद्ध होतात. त्यामुळे प्रत्येक गावचे प्रयोग त्या गावापुरतेच मर्यादित राहतात. हे दुष्टचक्र सोशल मीडियाच्या प्रभावी उपयोगाने सहज भेदता येईल आणि पुणे आवृत्तीत प्रसिद्ध झालेली बातमी अवघ्या महाराष्ट्रातील जागृत, संवेदनाशील कलारसिकांपर्
– दिनकर गांगल 9867118517
(‘महाराष्ट्र टाईम्स’वरून उद्धृत)
महाराष्ट्रात वाचन चळवळ आणि सांस्कृतिक विकास यावर सातत्याने भर देणारे लेखक, पत्रकार म्हणून दिनकर गांगल हे परिचित आहेत. त्यांचा हा लेख या सांस्कृतिक आस्था घेऊन वाचकांना सामोरा जात आहे.
माणसाचा विकास हा एकात्मिक पध्दतीने झाला तर सामाजिक समतोल टिकतो. गेल्या तीस एक वर्षांत आर्थिक विकास म्हणजेच प्रगती हे समीकरण प्रस्थापित झाले आहे. यात सांस्कृतिक विकास हा नगण्य राहिला आहे. तो वाढवत नेणे, आपले सर्वांचे सांस्कृतिक कर्तव्य आहे. ऐंशीच्या दशकात ही जाण प्रगल्भ होती. म्हणून काही चांगले उपक्रम पाहता आले. पुन्हा एकदा याच वातावरणाकडे आग्रहपूर्वक जाण्याची तयारी ठेवू.