मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेच्या प्रसारासाठी पुढाकार घेऊन जबाबदारीने सातत्यपूर्ण काम करण्याची गरज आहे. ह्या दृष्टीने मुंबई येथील सोमैया विद्यापीठात, भाषा आणि साहित्य तसेच ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विदयमाने ‘मराठी जगवायची कशी, विस्तारायची कशी?’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मराठी भाषेतून संभाषण व संवाद करणे आधुनिक तंत्रज्ञानामुळे सोपे झाले आहे. त्यामुळे तसे प्रयत्न करावेत व मराठीचा विस्तार साधावा असा अभिप्राय व्यक्त झाला. या चर्चासत्राला एमकेसीएलचे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत यांची विशेष उपस्थिती लाभली.

प्रारंभी डॉ. वीणा सानेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक दिनकर गांगल यांनी मनोगत व्यक्त केले. विवेक सावंत यांनी विस्तार विज्ञानातील मूलभूत तत्त्वे उपस्थितांसमोर मांडली. कार्यशाळेत मराठी भाषेच्या प्रसाराशी संबंधित समस्या आणि त्या अनुषंगाने उपाययोजना यांवर विविध मुद्द्यांचा विचार करत ऊहापोह करण्यात आला. इंटरनेटच्या काळातील मराठी, मराठी सुसंवादी होण्यासाठी काय करता येईल, मराठी भाषेसाठी काम करण्याच्या वेगळ्या पद्धती, समाजात मराठीच्या जतन-संवर्धनाची जाणीव कशी वाढवता येईल या मुख्य मुद्द्यांच्या अनुषंगाने उपस्थितांनी त्यांचे विचार, अनुभव मांडले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकताना येणाऱ्या अडचणी, रोमन लिपीत लिहिल्या जाणाऱ्या मराठीचे प्रमाणीकरण, नव्या शैक्षणिक धोरणातील मातृभाषाविषयक तरतुदी, स्पर्धापरीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मराठी भाषेच्या अभ्यासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, अमराठी भाषकांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण व्हावी म्हणून घ्यावे लागणारे उपक्रम, मराठी भाषा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, बालसाहित्य, शिक्षण आणि मराठी भाषा अशा अनेकविध पैलूंवर चर्चेत उपस्थितांनी मते व्यक्त केली.

ज्येष्ठ अनुवादक चंद्रकांत भोंजाळ, ज्योत्स्ना प्रकाशनाचे विकास परांजपे, लेखिका निर्मोही फडके, अभिनेत्री समिरा गुजर, बालसाहित्यिका ज्योती कपिले, लेखक श्रीकांत पेटकर, माधुरी नानल, प्राचार्या स्नेहल फोडसे, प्रा. मीरा कुलकर्णी सुभाष पाटील, मराठीविषयी आस्था असणारे अभ्यासक, प्राध्यापक, साहित्यिक या कार्यशाळेत सहभागी झाले. सोमैया विद्यापीठाच्या भाषा आणि साहित्य विभागाच्या अधिष्ठाता डॉ.वीणा सानेकर यांनी आभार प्रदर्शन केले. चर्चासत्राचा समारोप करताना त्यांनी या उपक्रमात युवा पिढीला जोडून घेण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली.
– प्रतिनिधी