अकलूजची ग्रामदेवता अकलाई देवी
अकलूज गाव सोलापूर जिल्ह्यातून वाहणा-या नीरा नदीकाठी वसलेले आहे. गावाचे नाव ग्रामदेवता 'श्री अकलाई देवी'च्या नावावरून पडले आहे. ते गाव मोगल काळामध्ये अदसपूर या नावाने ओळखले जाई. गावामध्ये तेराव्या शतकातील यादवकालीन भुईकोट किल्ला आहे. दिलेरखान आणि संभाजी महाराज त्या किल्ल्यामध्ये १६७९ मध्ये चार महिन्यांसाठी वास्तव्यास होते असे सांगितले जाते. दुसरे बाजीराव पेशवे त्यांचे पेशवेपद बरखास्त झाल्यानंतर तीन त्या ठिकाणी वास्तव्यास होते.
सुरुवातीला गावक-यांनी नीरा नदीच्या काठावर मंदिराची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर कै. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील, कै. बाबासाहेब माने-पाटील, कै. सदाशिवराव माने पाटील या तीन बंधूंनी आणि गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी मिळून देवीचे लहानसे मंदिर बांधले.