नक्षत्रवाती
भारतातील चालीरीती, व्रते, पूजा या परंपरेने, प्रांतानुरूप, जाती-समुदायनिहाय चालत आलेल्या आहेत. त्या बहुतेक सर्व निसर्गाच्या बदलांशी निगडित आहेत. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू, फुले, फळे तसेच संबंधित विधींचे स्वरूप हे निसर्गाच्या त्यावेळी असलेल्या स्थितीला अनुरूप असे असते. पावसाळ्यात कुटुंबांतील सर्व माणसे शेती-बागायतीमध्ये अडकलेली असायची. शेत-बागायत पिकून तयार झाली, उत्पन्न हाताशी आले, की ती माणसे निवांत होत असत. त्यानंतर त्यांचे सगळे महत्त्वाचे सणवार सुरू होतात. म्हणून श्रावणापासून मार्गशीर्ष महिन्यापर्यंत आगळीवेगळी व्रतवैकल्ये आहेत. कालौघात त्यातील अनेक प्रथा, रूढी खूप वेगळ्या रूपात पुन्हा अवतरलेल्याही दिसतात. फक्त कार्तिकातील ‘नक्षत्रवाती लावणे’ हे व्रत असेच एक पूर्ण विस्मृतीत गेलेले.