पाण्याचे खाजगीकरण : दशा आणि आशा (Privatization of Water: Condition and Hope)
पाण्याच्या खाजगीकरणाचा पुरस्कार भारताच्या राष्ट्रीय जलनीतीमध्ये करण्यात आला आहे. खाजगीकरणाचा प्रयोग दिल्लीसारख्या राज्यात करण्यातही आला आहे. पाण्याची मुक्त बाजारपेठ पाण्याचे दर ठरवील; भाव वाढले, की त्याचा वापर कमी होईल आणि मागणी व पुरवठा ह्यांत समतोल साधला जाईल अशी अपेक्षा या धोरणानुसार व्यक्त करण्यात येते. जागतिक बँकेने आर्थिक मदत देण्यासाठी 1995 च्या आसपास ज्या अटी घातल्या त्यात महत्त्वाची अट होती, पाण्याचे खाजगीकरण ही! जागतिक बँकेची अपेक्षा अशी, की खाजगीकरण केले, की बाजारपेठेतील स्पर्धा भ्रष्टाचार नष्ट करील आणि बड्या बहुराष्ट्रीय कंपन्या त्या क्षेत्रात पैसा गुंतवतील. त्यांनी मत मांडून ठेवले आहे, की शुद्ध व स्वच्छ पाणी हे सगळ्यांना मिळावे ह्यासाठी जो पैसा आवश्यक आहे तो ह्या मार्गाने उभा राहील. बहुराष्ट्रीय, गर्भश्रीमंत कंपन्या त्यांचे सामाजिक कर्तव्य म्हणून मानवकल्याणाचे हे काम करतील आणि त्यातून कंगाल, गरीब, दरिद्री अशा तिसऱ्या जगाची पाण्याची तहान भागू शकेल!